Friday, 22 May 2026

हिमाचल मधील कांगडा किल्ला


हिमाचल प्रदेश हा जसा हिमालयासाठी प्रसिद्ध आहे तसाच तो पुरातन मंदिर आणि किल्ले यांच्यासाठी सुद्धा आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्या, हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं जशी मनाला भुरळ पाडतात तशीच ही जुनी मंदिर आणि किल्ले ही घालतात. इथल्या कांगडा जिल्ह्यात असाच एक पहाडी किल्ला आहे त्याला कांगडा दुर्ग असेही म्हणले जाते. याला पूर्वी नगरकोट किंवा त्रिगर्त असं नाव होतं. हे त्रिगर्त साम्राज्य व्यास किंवा बाणगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेलं होतं. खूप पूर्वी हा भाग पंजाब मध्ये मोडत असे. कांगडा दुर्ग त्याची अभेद्यता, वैभव आणि सामरिक दृष्ट्या ओळखला जातो. भौगोलिक दृष्ट्या हा माँझी आणि बाणगंगा नद्यांच्या संगमावर स्थित आहे.

संगमावर असलेल्या एका डोंगरावर बांधलेला हा किल्ला जवळ जाईपर्यंत दृष्टिक्षेपात येत नाही. सामरिक दृष्ट्या संपूर्ण कांगडा खोऱ्यावर हा देखरेख करतो. किल्ल्याची तटबंदी सुमारे चार किलोमीटर लांब आहे आणि दोन बाजूंनी नदी तर दोन बाजूंनी उंच पहाडांनी हा दुर्गा वेढलेला आहे. पायथ्यापासून सुमारे 300 फूट उंच या किल्ल्याला गावाच्या बाजूने प्रवेशद्वार आहे. एका रुंद अशा फरसबंदी वाटेने आपण दुर्गात प्रवेश करतो.



दुर्गांत प्रवेश करताना प्रथमतः रणजीतसिंहद्वार नंतर आहिनी आणि अमिरी दरवाजा आपल्याला लागतात. पुढे एक चढाव चढून गेल्यावर जहांगीर दरवाजातून पण प्रवेश करतो. हा दरवाजा चौथा मुघल शासक जहांगीर यांच्या काळात बांधला गेल्याचे सांगतात. आहिनी दरवाजा पुढे चढावर तटबंदी डाव्या बाजूला आहे तर उजव्या बाजूला किल्ल्याचा डोंगर आहे. या तटबंदीमध्ये एका ठिकाणी महिषासुरमर्दिनी आणि श्री गणेशाचे शिल्प अंकित आहे तसेच हनुमंत सुद्धा आहेत.

कदाचित इस्लामी राजवटीनंतर आणि इंग्रजांच्या आधी असलेल्या कटोच हिंदू राजवटीमध्ये किल्ल्याची डागडुजी झाली असावी. त्यादरम्यान ही शिल्प येथे लावली गेली असावी. पुढे यु टर्न घेऊन आपण जहांगीर दरवाज्यातून आत प्रवेश करतो.

त्यानंतर येतो एक अर्धवट चिणलेला दरवाजा. याच्या एका बाजूला गंगा तर दुसरीकडे यमुना अंकित आहे. याच्यापुढे उजव्या बाजूला एक विस्तीर्ण पटांगण आणि त्याच्या पलीकडे काही खोल्या आहेत. संपूर्ण फरसबंदी हे पटांगण कधीकाळी एखाद्या प्रचंड मंदिराच्या सभागृहाचा भाग असावा असं वाटतं. याचे स्तंभ पडलेले आहेत. वर जाणाऱ्या पायऱ्यांच्या बाजूला चार-पाच कळसांचे अवशेष ठेवलेले आहेत. त्यांच्या आकारमानावरून मूळ मंदिराचे कळस किती उंच आणि विस्तीर्ण असतील याचा अंदाज आपण बांधू शकतो. महाराष्ट्रातील अमृतेश्वर, गोंदेश्वर तसेच पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या कळसाच्या टोकाला असलेले दगडी चक्र इथेही आहेत. नागरशैलीतील हे भग्न मंदिर अजूनही जुन्या वैभवाच्या खुणा राखून आहे.

मार्गाच्या डाव्या हाताला उध्वस्त बांधकाम दिसते. हे कदाचित किल्लेदार, शिबंदी यांची घरे असावीत. इथेच एक कोरडी पडलेली विहीर सुद्धा आहे. तसेच दोन बारा ते पंधरा फुटांचे प्रचंड दगडी स्तंभही आहेत. त्यांच्यासमोर अजून दोन स्तंभाचे अवशेष आहेत. अशा या चार प्रचंड दगडी स्तंभांच येथील प्रयोजन काही लक्षात आलं नाही. त्याच मार्गाने थोडं वर आलं आणि मागे वळून बघितलं तर मंदिराच्या शिल्लक राहिलेल्या भिंतीचा बाह्यभाग आणि छताचे अवशेष दिसतात. अत्यंत सुंदर असं कोरीव काम इथे आहे. अगदी इंचभर सुद्धा जागा मोकळी दिसत नाही. त्यापुढे उजव्या हाताला एक समतल मैदान दिसतं. शिल्लक भिंती, त्यातील कोनाडे, छताची ठेवण यावरून ते कदाचित राजप्रसादाचा भाग असावा असं वाटतं. अजून काही पायऱ्या चढून आपला प्रवेश किल्ल्याच्या टोकावर होतो. इथेही एक हौद आणि राजप्रसादाचे अवशेष दिसतात. इथल्या टोकावरून नदीसंगम खूप सुरेख दिसतो. त्याशिवाय दूरवरचा बराच मुलुख नजरेत येतो.

इथून दिसणार दृश्य याच सामरिक महत्त्व अधोरेखित करतात. गंगा-यमुना दरवाजाच्या आधी थोड्या अंतरावर एक रस्ता किल्ल्याच्या मागील बाजूस जातो. अतिशय दाट जंगल आणि वन्य श्वापदांचा वावर यामुळे तेथून पुढे जाण्यास मज्जाव आहे. मात्र संकटकाळी वापर करण्यासाठीचा एखादा दरवाजा तिथे असावा असे वाटते. मुघलांनंतर संसारचंद या कटोच राजाच्या कारकीर्दीत 18 व्या शतकात या दुर्गाचा सुवर्णकाळ होता असे म्हणतात. त्यानंतर महाराजा रणजीत सिंग यांच्या अखत्यारित हा किल्ला होता. पुढे इंग्रजांकडे आल्यावर मात्र याच्याकडे दुर्लक्ष झालं. किल्ल्याचं सर्वात जास्त नुकसान 1905 साली आलेल्या भूकंपामुळे झालं.

निश्चितच या किल्ल्याने मोठं वैभव अनुभवलेलं असणार. आज अस्तित्वात असलेल्या अवशेषांवरून सुद्धा जुन्या वैभवाची साक्ष पटते. इथे उत्खननात सापडलेल्या अवशेषांच एक सुंदर वस्तूसंग्रहालय पुरातत्त्व खात्याने किल्ल्याच्या पायथ्याशी चालू केले आहे. ते सुद्धा आवर्जून बघण्यासारखं आहे. सह्याद्रीतल्या दुर्गांप्रमाणे राकट, कधी भीतीदायक, बेलाग वगैरे वाटत नसला तरी स्थानिक भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता पर्यटक आणि इतिहासाच्या अभ्यासकांना तो निश्चितच भुरळ घालतो.

Saturday, 18 April 2026

टाकळी ढोकेश्वर


परीक्षा घेण्याच्या निमित्ताने अहिल्यानगरला (पूर्वीचे अहमदनगर) जाणे झाले. परीक्षा सकाळी दहा वाजता चालू करायची होती. त्यामुळे सकाळचे चार तास दिमतीला होते. येतानाच जवळपासची ठिकाणं गुगलला विचारून घेतली होती त्यात टाकळी ढोकेश्वर च नाव सापडलं. या जागेबद्दल पूर्वी कधीतरी वाचल्याच आठवत होतं. म्हणलं चला या निमित्ताने भेट देणे होईल. अहिल्यानगर वरून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर आहे. सकाळी सहा वाजता निघाल्याने रस्त्यावर वर्दळ अतिशय कमी होती. शिवाय रस्ता नव्याने बनवला असल्याने खड्डे मुक्त होता. त्यामुळे साधारण ४०-४५ मिनिटात टाकळी गावापर्यंत पोहोचलो. पुढे पायथ्याशी जाईपर्यंत १५ मिनिटे लागली. गावातून पायथ्यापर्यंतचा रस्ता वळणावळणाचा आणि शेवटचे साधारण दीड-दोन किलोमीटर मातीचा आहे. पायरी मार्ग जिथून सुरू होतो तिथपर्यंत गाडी जाऊ शकते परंतु रस्ता दगड-मातीचा असल्याने वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे.



पायथ्याशी पोहोचताक्षणी नजरेत भरते घडीव दगडांची तटबंदी आणि दरवाजा. जुन्या तटबंदीला काही ठिकाणी नव्याने दगड लावून केलेली डागडूजीही लक्षात येते. पायऱ्यांच्या बाजूला एक घुमटीवजा बांधकाम आढळते. आतमध्ये समाधी असावी असा चौथरा दिसतो. त्याच्या दरवाजावर आणि भिंतींवर अत्यंत सुंदर अशी शिल्प कोरलेली आहेत. त्यात तोरणावरच्या गणेशपट्टी मधला साखळदंड अतिशय सुरेख आहे. पुढे पायऱ्या चढून दरवाजापर्यंत गेलं की तिथे एक शिलालेख आढळतो. दरवाजात उभे राहिल की डाव्या हाताला एका दगडावर जो भिंतीचा भाग आहे त्यावर तीन ओळींचा शिलालेख कोरलेला आहे. देवनागरीमध्ये असलेल्या या शिलालेखाचे अद्याप वाचन झाले आहे की नाही याची माहिती मिळाली नाही, तथापि सिंगण असा एक शब्द त्यात असल्यामुळे यादव राजवटीशी शिलालेखाचा संबंध असावा असे वाटते.



वस्तुतः लेण्यांमधील कोरीव कामाची धाटणी चालुक्य आणि राष्ट्रकूट राजवटींच्या दरम्यानच्या काळाशी साद्ध्यर्म्य सांगते४०-४५ पायऱ्या चढून वर गेलं की उजवीकडे छोटंसं मैदान वजा मोकळी जागा दृष्टीस पडते. तिथे डावीकडे लेण्यांचे प्रवेशद्वार आहे. पुरातत्व खात्याच्या आखत्यारित असलेल्या या मंदिराला जाळीचा दरवाजा बसवून संरक्षित करण्यात आले आहे. बाहेर एक दीपमाळ ही दिसून येते. लेण्यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दोन्ही बाजूला आठ ते दहा फूट उंचीच्या स्त्री प्रतिमा कोरलेल्या आहेत. गंगा आणि यमुना यांचे त्या प्रतीक आहेत. त्यापैकी यमुनेची मूर्ती कालौघात थोडीशी भग्न झाल्यासारखी वाटते.



दरवाजातून आपण २५ x ४० फुटाच्या विस्तीर्ण सभामंडपात प्रवेश करतोसभामंडप चार मुख्य खांबांवर तोडून धरलेला दिसतो. चारही खांबांवर सुंदर असे कोरीव काम आहे. सभामंडपात उजवीकडे तांडव नृत्य करणारा महादेव तर डावीकडे सप्तमातृका ज्यांमध्ये ब्राम्ही, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, आणि चामुंडी यांचा समावेश होतो त्यांच्या वाहनांसमवेत तसेच गणपती मोदकांच्या राशी समवेत आणि वीरभद्र अतिशय रेखीवपणे दाखवण्यात आलेले आहेत. महादेवाच्या जवळ एका नागाची आकृतीही कोरलेली आहे.


सभामंडपात मध्यभागी एक छोटा नंदी आहेत्याच्यासमोर गर्भगृहाचे छोटे प्रवेशद्वार असून वाकून प्रवेश करावा लागतो. गर्भगृहाच्या छतावर नक्षीकाम दिसून येते. अजिंठा लेणीमध्ये आढळणाऱ्या भित्तिचित्रांसारखे हे नक्षीकाम वाटते. आता जरी ते काळवंडलेले दिसत असले तरी त्याची symmetry आणि एकंदरीतच pattern  गतवैभवाची साक्ष देतात. गर्भगृहात मध्ये प्रवेश केल्यावर समोर महादेवाची चौकोनी पिंड दृष्टीस पडते.


वंशपरंपरेने चालत आलेलं पुजारी पण गोसावी कुटुंब अत्यंत निष्ठेने पार पाडत असल्याने मंदिराची, शिवपिंडीची देखभाल अतिशय योग्य प्रकारे झालेली दिसून येते. सध्या श्री सार्थक गोसावी हे इथली साफसफाई आणि पूजाअर्चा याची व्यवस्था बघतातगर्भगृहाच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या आकृती दिसतात. उजव्या बाजूच्या द्वारपालाच्या शेजारी जी आकृती आहे ती काही जणांना पूर्वीच्याकाळी पाणी वाहून नेणारे अर्थात भिस्ती यांची वाटते तर काहींना इतर वजन वाहून नेणारे वाटतात. गर्भगृहाला उत्तरेकडे अजून एक दरवाजा असून त्याच्या बाहेर एक पाच साडेपाच फुटाचा नंदी कोरलेला आहे. त्याच्या अलीकडे प्रदक्षिणा मार्गावर काही वीरगळीही आढळतात. प्रदक्षिणेच्या मार्गावर डावीकडे एका बंदिस्त जागेत अनेक मूर्ती ठेवलेल्या दिसून येतात. विष्णूच्या विविध रूपातील मूर्ती, गणेश, महादेवाच्या पिंडी आणि इतर अनेक भगनावस्थेतल्या मूर्तींचा त्यात समावेश आहे. विष्णूच्या बहुतेक मूर्ती या केशव स्वरूपातील असून सहज ओळखू येतात.



गर्भगृहाची रचनाही काही प्रमाणात मुंबई जवळील घारापुरी आणि छत्रपती संभाजीनगरजवळच्या वेरूळ लेण्यांशी साद्ध्यर्म्य दाखवते. या मुख्य लेण्याबाहेर दीपस्तंभाजवळ उभा राहिलं की समोर प्रचंड मोठा कॅनव्हास उलगडून  ठेवल्यागत दृश्य दिसतंविस्तीर्ण सपाट जमीन, डोंगर, नदी, जलाशय अतिशय सुंदर दिसतात. लेण्यांच्या डावीकडे कातळात काही खोदीव टाकी आढळतात. पाणी साठवून ठेवण्यासाठी ही सोय केलेली दिसून येते. मुख्य रस्त्यापासून दूर असलं तरी आवर्जून वाट वाकडी करून बघण्यासारखं हे सुंदर लेणं आहेपरंतु कालौघात काही प्रमाणात झळा पोहोचल्या आहेत, तरीसुद्धा जे काही शिल्लक आहे त्यातूनही आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची जाणीव मनाला सुखावून जाते.