राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
यानुसारच अगदी दगडांचा कणखरपणा आणि फुलांचा कोमलपणा एकाच ठिकाणी अनुभवायचे असेल तर पाटेश्वर देवस्थान अतिशय योग्य स्थळ आहे. साताऱ्यापासून सुमारे १०-१२ किलोमीटर अंतरावर देगांव MIDC जवळ हे ठिकाण आहे. देगांव पार केल्यावर छोटासा घाटरस्ता आपल्याला डोंगरावर घेऊन जातो. थोड्या सपाटीवर तेथे गाडी लावून पुढे चालत निघायचे. येथे येण्यासाठी बोरगाव मार्गे सुद्धा एक रस्ता आहे पण देगावची वाट जास्त प्रचलित आहे. सुरुवातीच्या टप्प्यात थोड्या पायऱ्या अन उजवीकडे बाजूला श्रीगणेशाची रिद्धीसिद्धीसहित शेंदूर लेपित मूर्ती कोरलेली दिसते. एकटा गेलो होतो म्हणून “बिबटे आणि रानडुकरांचा वावर तेथे आहे” अशी सूचना वाचून जरा धडकी भरली खरी पण तुम्ही एकटे नसाल तर घाबरण्याची गरज नाही. पण थोडी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
पायऱ्या संपल्यावर पायवाट पुढे डोंगरातून जवळपास एक दिड किलोमीटर असेल. दोन्ही बाजूला जंगल आणि त्यातून पक्षांचा गुंजारव सतत कानी पडत असतो. त्याचबरोबर मुंगूस, साळींदर, माकडे, साप, रानडुक्कर यांच्या हालचालींमुळे पाल्यापाचोळ्याचा आवाज येत असतो. आपण एकटे नसल्याची जाणीव सतत सोबत असते. आपल्याला एखादा प्राणी-पक्षी दिसला कि आपल्याला भारी वाटते पण जंगलात शिरण्याअगोदरच शंभरावर नजरा आपला मागोवा घेत असतात याची जाणीवही आपल्याला नसते. परंतु प्राण्यांचे मनुष्यासारखे नसते, आपण डिवचल्याखेरीज ते त्रास देत नाहीत.
मुख्य मंदिराजवळ आले की उजवीकडे एक बांधीव तलाव दिसतो. भरपूर कमळे त्यात नेहमीच फुललेली दिसतात. पायवाट तलावासमोरच्या आश्रमासमोर संपते. गोविंदस्वामी महाराजांचा आश्रम आणि तलाव यांच्यामधून बांधीव पायऱ्यांचा मार्ग मुख्य मंदिराकडे जातो. मंदिर प्रकारच्या अलीकडे एक पायवाट उजवीकडे जाते. तेथे एक छोटी घुमटीवजा मंदिर आहे. त्याआधी एका वृक्षाला टेकून एक गरुडमूर्ती उभी आहे. मंदिर प्राकारात शिरण्यापूर्वी डावीकडे भिंतीमध्ये एक प्रचंड शिवलिंग आहे. तर उजवीकडे एका देवडीमध्ये हनुमानाची मूर्ती आहे. छोट्या तटबंदी मधून आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो. फरसबंदी प्रांगण, दोन दीपस्तंभ, छोट्या घुमटीमधला नंदी आणि मंदिराची एकूणच रचना कसल्याशा गूढतेची जाणीव करून देतात. मुख्य मंदिराशिवाय इथे महिषासूर मर्दिनी आणि चतुर्मुख ब्रह्मदेव यांचीही छोटी मंदिरे आहेत. शेषशायी विष्णूची देखील एक सुंदर मूर्ती इथे नजरेस पडते. मंदिराच्या एकंदरीत रचनेवरून ते ४००-५०० वर्षे पुरातन असावे असा अंदाज आहे. मंदिराच्या तटबंदीला वळसा घालून वरच्या बाजूला गेल्यास तेथे कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. मोरावर आरूढ एक छोटी मूर्ती तेथे आहे. बोरगावची वाट कार्तिक स्वामी मंदिराच्या याजवळ पोहोचते.
मुख्य मंदिराव्यतिरिक्त येथे अन्य ८ मंदिरे आहेत जी आश्रमाच्या मागच्या बाजूला गुहांमध्ये आहेत. ही मंदिरेच खरेतर इथली मुख्य आकर्षण आहेत. असंख्य शिवपिंडी येथे गुहांमधून, मंदिरातून आढळून येतात. एका गुहेवजा मंदिरात इथे अग्निवृष मूर्ती आहे. ऋग्वेद आणि इतर भारतीय ग्रंथात वर्णन केल्यानुसार सात हात, तीन पाय आणि दोन डोके अशा मानव आणि वृषभ अशा दोहोचाभास होणारी सुंदर मूर्ती इथे आहे. प्रथमदर्शनी मूर्ती नंदीची वाटते पण तो अग्निवृष आहे. भारतात इतरत्र अशी मूर्ती आढळल्याची नोंद नाही. ऋग्वेदातील वर्णन याला चपखल लागू पडते.
चत्वारि शर्ङगा तरयो अस्य पादा दवे शीर्षे सप्त हस्तासो अस्य |
तरिधा बद्धो वर्षभो रोरवीति महो देवो मर्त्यां आ विवेश ||
अग्निवृष मंदिराच्या पाठीमागे गुहांमध्ये ब्रह्मिणी, वैष्णवी, आणि माहेश्वरी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. खाली कोरलेल्या त्यांच्या वाहनांवरून आपण ते सहज ओळखू शकतो. इतर गुहांमध्ये असंख्य शिवपिंडी आढळून येतात. त्याशिवाय इतरही अनेक कोरीवमूर्ती तेथे आहेत पण संशोधनाअभावी त्यावर व्यक्त होणे धारिष्ट्याचे ठरेल. सर्वात शेवटी इथे वऱ्हाडघर मंदिर आहे. इथल्या नंदीच्या अंगावरील कोरीवकाम अप्रतिम आहे. याठिकाणी एक चतुर्मुख शिवपिंड आहे. याशिवाय लिंगाच्या जागी दोन कुंभ असलेले कुंभेश्वर महादेव देखील इथे आहे. इथल्या मंदिरात मूळ शिवलिंगावर असंख्य शिवपिंडी कोरलेल्या आहेत. हजाराहूनदेखील त्या जास्त असाव्यात. त्याशिवाय इथल्या खांबावरील कोरीव काम अतिशय सुंदर आहे. येथे नवग्रह शिळेवर कोरलेले आढळून येतात. काहींच्या मते ते विष्णू अवतार आहेत. सप्तमातृका इथे एका शिळेवर कोरलेल्या आहेत. त्यात एक गणेश शिल्प सुद्धा आहे. अतिशय पुसट आणि अगम्य असा एक शिलालेख इथे आहे. कदाचित देवनागरी लिपीमधील असावा. पण अजूनतरी त्याचे वाचन करण्यात यश आलेले नाही.
मुख्य पाटेश्वर मंदिरापेक्षा या सर्वांचा काळ बराच जुना आहे. एकंदरीतच इथले वातावरण गूढतेने भारलेले आहे. त्यात जंगल आणि किमान मानवी हस्तक्षेप अधिकच भर घालतो. पुरातनकाळी शाक्त किंवा इतर अघोरी पंथाच्या उपासनेचे हे मुख्य स्थान असावे असे वाटते. सोमवार आणि महाशिवरात्रीला इथे मोठ्या संख्येने भाविक येतात. मात्र हे दिवस सोडल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने इथे सकाळी ९ नंतर आणि सायंकाळी ५ पूर्वी भेट देणे उचित ठरेल. अजूनही हे ठिकाण फ़ार प्रसिद्ध नाही परंतु पर्यटकांची नसली तरी संशोधकांची पाऊले इकडे वळावी ही अपेक्षा. इतका मोठा अनमोल ठेवा इथे आहे. मात्र ज्ञात इतिहास त्याबाबत अनभिज्ञ आहे. स्थानिकांनाही त्याबाबत फारशी माहिती नाही. शेकडो वर्षांपासून या साऱ्या मूर्ती, मंदिरे मुकेपण वागवत आहेत. कुण्या संशोधकांनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न करायला हवा. ही सारी दगडं जर बोलायला लागली तर फार मोठ्या इतिहासावरचा पडदा बाजूला होईल आणि आपल्या सांस्कृतिक, सामाजिक वारशात अजून मोलाची भरच पडेल.





No comments:
Post a Comment