महाराष्ट्राला लेण्या आणि मंदिरांच्या रूपाने शिल्पकलेचा मोठा समृद्ध वारसा लाभला आहे. लेण्यांच्या बाबतीत तर भारतात आढळणाऱ्या लेण्यांपैकी सुमारे ८०% लेण्या या महाराष्ट्रात आहेत. सह्याद्री ज्यापासून तयार झालेला आहे त्या बेसॉल्ट दगडापासून आपल्या पूर्वजांनी इथे मंदिरेसुद्धा उभारली. अशा काळ्या दगडातील मंदिरांना आपल्याकडे हेमाडपंथी मंदिरे म्हणून ओळखल्या जाते. खरे तर पुरातत्त्वशास्त्र किंवा भारतविद्या यांनुसार यादवांचे प्रधान हेमाद्रीपंत आणि या मंदिर स्थापत्याचा तसा काही संबंध नाही. दगडांमध्ये खाचा करून आणि इतर दगड त्यात गुंफून ही मंदिरे उभारली जात. त्याला शुष्कसांधा स्थापत्य असेही म्हणतात कारण चुना अथवा सिमेंटसदृश कोणताही पदार्थ त्यात वापरला जात नसे. इसवी सनाच्या १२-१३ व्या शतकापर्यंत साधारणतः अशा मंदिरांची उभारणी झालेली दिसून येते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशी मंदिरे आढळून येतात. अशाच धाटणीचं एक सुंदर मंदिर, त्यापेक्षा कलाकृती म्हणूयात, औरंगाबाद जवळ आहे. औरंगाबाद-अजिंठा रस्त्यावर सिल्लोड या तालुक्याच्या ठिकाणाहून थोडे पुढे, गोळेगाव फाट्यापासून आत सुमारे १० किलोमीटर अंतरावर अन्वा हे एक छोटे गाव आहे. कित्येक शतकांपासून या गावाने हा अनमोल ठेवा जपलाय. गाडीरस्ता थेट मंदिरापर्यंत आहे. परंतु अगदी जवळ जाईपर्यंत मंदिराचं अस्तित्व लक्षात येत नाही. कालौघात म्हणा किंवा परकीय आक्रमणामुळे मंदिराला कळस शिल्लक नाही. त्याऐवजी सिमेंटच लिंपण केलेलं दिसून येत.
आता सगळ्याबाजूंनी घरांनी वेढलेल्या विस्तीर्ण अशा आवारात प्रवेश करताक्षणी नजरेत भरते ते ४-५ फूट उंचीचे जोतं. या जोत्यावरील मंदिराची उंची साधारण १५-२० फूट असावी. ज्यावेळी मंदिर अखंड असेल त्यावेळी गाभाऱ्यावरील शिखरासहित मंदिराची उंची किमान ३०-४० फूट भरत असावी. मंदिराच्या पिठाच्या पायऱ्या चढताना दोन्ही बाजूला असलेले द्वारपाल लक्ष वेधून घेतात. सभामंडपात प्रवेश करताक्षणी नजरेत भरतात ते अत्यंत सुरेख असे शिल्पकाम केलेले स्तंभ. लहान-मोठे मिळून सुमारे ५० स्तंभ या मंदिरात आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी नंदीची सुंदर मूर्ती आहे. केवळ स्तंभच नाही तर सभामंडप आणि गर्भगृहाच्या छतावर सुद्धा अत्यंत देखणे असे शिल्पकाम आढळते. लक्षात येण्यासारखे म्हणजे सभागृहाचे छत हे एकसंध, एकाच दगडाचे नसून दगडाच्या अनेक छोट्या तुकड्यांपासून, त्यांना एकमेकांमध्ये सांधून बनवण्यात आलेले आहे.
गर्भगृहाच्या छतावर असलेले नक्षीकाम एखाद्या फुलाच्या पाकळ्यांप्रमाणे दिसते. त्यातही आतमध्ये एक मनुष्याकृती कोरलेली आहे. गर्भगृहात अंधार असल्याने प्रकाश टाकल्यावरच हे आश्चर्य दिसते. मंदिराच्या खांबांवरील शिल्पांची प्रमाणबद्धता पाहून कोणीही आश्चर्य चकित होईल इतकी ती सुंदर आहेत. केवळ प्रमाणच नाही तर त्यांच्या हालचालींचे बारकावे, चेहऱ्यावरील भावमुद्रा सारेच बघण्यासारखे आहेत. बाहेरील बाजूनेही सर्वात खाली हंसपट्टी, त्याच्यावरच्या स्तरामध्ये हत्ती, सिंह, मनुष्य अशा विविध आकृती अंकित आहेत. इथली मानवी आकृत्यांची वस्त्रप्रावरणे, आभूषणे आज सुद्धा फॅशन म्हणून वापरली जाऊ शकतात इतकी देखणी आणि लक्षणीय आहेत.
या सर्व शिल्पांव्यतिरिक्त अजून एक आश्चर्य ह्या मंदिराने जोपासलंय. शंख, चक्र, गदा, आणि पद्म यांच्या क्रमानुसार चतुर्भुज विष्णूंची केशव, नारायण, माधव, संकर्षण इत्यादी २४ रूपे सर्वश्रुत आहेतच. याच २४ प्रकारांचे स्त्रीरूपातील अंकन गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर केलेले आहे. वाङ्मयात यांचे वर्णन विष्णूंच्या २४ शक्ती असे केलेले आढळते.
तसे पाहिले तर मंदिर शिवाचे परंतु त्यावर अंकन विष्णूंच्या २४ रूपातील शक्तींचे. एका अर्थाने शैव आणि वैष्णव पंथांचा सुंदर मिलाफ इथे आपल्याला पाहायला मिळतो. विचारधारा वेगळया, दैवतं वेगळी, उपासनेचे विधी वेगळे तरीही शिल्पकलेच्या माध्यमातून दोन्हीही पंथ इथे तादात्म्य पावलेत. कुणा एकाला कमी अथवा जास्त न लेखता अशी समरसता दर्शवणे ही जशी शिल्पकाराच्या उच्चकोटीच्या कौशल्याची प्रचिती, तशीच ती भारतीय संस्कृतीच्या सर्वांना सामावून घेणाऱ्या सांस्कृतिक प्रवाहाच्या दिव्यत्वाची अनुभूती..!






No comments:
Post a Comment